कार्यावर दृष्टिक्षेप

जगातली सगळ्यात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. या लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव अर्थातच सार्वत्रिक निवडणूक नुकतीच आपल्या खंडप्राय देशात झाली. सुमारे अडीच महिने ही निवडणूक प्रक्रिया चालली होती. या निवडणुकीतही देशातल्या सुज्ञ मतदारांनी पुन्हा एकदा माझ्या भारतीय जनता पार्टीलाच बहुमतानं निवडून दिल्याचं निकालांतून स्पष्ट झालंय. त्यामुळे आमचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधानपद होताहेत. पक्षाचा निष्ठावान पाईक म्हणून या विजयाचा आनंद आहेच. पण विशेष आनंदाची बाब म्हणजे या निवडणुकीत पक्षानं माझ्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वी करण्याचं भाग्यही मला लाभलं. देशाचा कौल सलग दुसऱ्या पाच वर्षांसाठी मिळवला, त्या निवडणुकीत पक्षासाठी योगदान देता आलं, हा माझ्यासाठी आयुष्यभराचा आनंदाचा ठेवा आहे.

तर या लोकसभा निवडणुकांसाठी माझ्या पक्षानं अर्थात भाजपानं रणनीती आखली होती. लोकसभेसाठी ४८ जागा निवडून देणारं एक मोठं राज्य म्हणून स्वाभाविकच महाराष्ट्रासाठीही आम्ही व्यूहरचना केली होती. राज्याचं नेतृत्व कुशलपणे सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याचकडे साहजिकच निवडणुकीचीही धुरा होती. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्य नेते उद्धवजी ठाकरे आणि आमच्या युतीतील प्रत्येक घटक पक्षाच्या प्रत्येक नेत्यानंच नव्हे तर कार्यकर्त्यांनंही अत्यंत तडफेनं, प्रामाणिकपणानं आणि फक्त आणि फक्त विजयच मिळवायचा या जिद्दीनं काम करून हा विजय साकारला आहे. हा विजय त्या सगळ्यांचाही आहेच. त्यामुळे या कार्यकर्त्यांसह आमच्या युतीला मत देणाऱ्या प्रत्येक मतदाराचेही या निमित्तानं मी आभार मानतो. तुम्ही विश्वास दाखवलाय, आता तो आम्ही कामातून सार्थ ठरवू, हा माझा शब्द आहे.

असो. या निवडणुकीच्या व्यूहरचनेचा भाग म्हणून प्रत्येक नेत्यावर काही मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार माझ्याकडे प्रामुख्यानं कोल्हापूर, हातकणंगले, माढा, सांगली आणि बारामती हे ५ लोकसभा मतदारसंघ होते. आव्हान सोपं नव्हतंच, पण सोपं असेल तर ते आव्हान कसलं? आमच्या नियोजनानुसार या सर्व मतदारसंघांमध्ये कामाला सुरुवात केली. हे पाचही मतदारसंघ मी अक्षरशः पिंजून काढले. हे पाचही मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातले. महाराष्ट्राच्या या भागात काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार निवडून येण्याची परंपराच. कोल्हापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक, हातकणंगल्यातून राजू शेट्टी (जे निवडून येताना आमच्यासोबत होते आणि निवडणुकीवेळी काँग्रेस आघाडीसोबत होते.) आणि बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे अशा प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान माझ्यासमोर होतं. सांगलीतली संजयकाका पाटील यांची जागा पुन्हा जिंकू असा विश्वास होता, पण गाफील राहून चालणार नव्हतं. माढ्यातून निवडून आलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांचा २१ मार्च रोजी भाजपामध्ये प्रवेश झाला होता खरा, पण त्यामुळे प्रतिस्पर्धी अधिकच आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. खुद्द शरद पवार यांनी थेट निवडणुकांतून पत्करलेली निवृत्ती बाजूला सारून ही जागा लढवण्याची घोषणा केली होती. अर्थात नंतर त्यांनी ही जागा लढवली नाही, हा पुढचा भाग झाला. तरीही आमचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यापुढे संजयमामा शिंदे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचं आव्हान होतं…

आज निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. त्यातून कोल्हापुरातून युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी (२,७०,५६८ मतांनी), हातकणंगल्यातूनही शिवसेनेच्याच धैर्यशील माने यांनी (९६,०३९ मतांनी), सांगलीतून भाजपाच्या संजय पाटील यांनी (१,६१,२६९ मतांनी) आणि काटे की टक्कर म्हणतात तशा प्रतिष्ठेच्या लढाईत माढ्यातून भाजपाच्याच रणजितसिंह निंबाळकर यांनी (८४,७५० मतांनी) विजयश्री मिळवल्याचं समोर आलंय. आपल्या परिश्रमाचं चीज झालं, असं वाटण्यासारखेच हे निकाल आहेत. ऐन उन्हाळ्यात, डोक्यावर प्रचंड उन तापलेलं असूनही आम्ही युतीच्या शिलेदारांनी खेचून आणलेले हे विजय आहेत. बारामतीत मात्र पवार कुटुंबानं पूर्ण ताकद लावल्यामुळे तो मतदारसंघ काही आम्हाला काबीज करता आला नाही. अन्यथा माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीत मी शत प्रतिशत यशस्वी झालो असतो आणि मग हा आनंद शतगुणित झाला असता.

मतदारांनी आम्हाला जो काही कौल दिलाय, तो मी शत प्रतिशत मान्य करतो. आणि असंही, मतदारांचा कौल किंवा ज्याला आपण जनादेश म्हणू, तो मान्य करणं, हाच तर लोकशाही व्यवस्थेतला कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे जनादेश स्वीकारून मी आमच्या या विजयी वीरांना विजयाबद्दल हार्दीक शुभेच्छा देतो. हे आमचे वीरच का, या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला आहे, अशा प्रत्येक विजयी उमेदवाराचं मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. हे अभिनंदन करताना पक्ष, राज्य किंवा अन्य कुठलाही भेद करण्याचं काहीच कारण नाही. कारण निवडून आलेला प्रत्येक उमेदवार हा माझ्या देशाच्या, भारताच्या लोकसभेत जाणार आहे आणि माझा प्रिय भारत देश प्रगतीपथावर नेण्यासाठी काम करणार आहे, असा मला विश्वास आहे.

म्हणूनच, आज निवडणुकीची रणधुमाळी संपल्यावर मी आणखी एक गोष्ट स्पष्ट करतो. प्रचार आणि एकूणच या निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनेकांशी संवाद वा अगदी विसंवादही झाला असेल. एखादा शब्द माझ्याकडूनही उणा-अधिक गेला असेल… पण आता तो विषय संपला आहे. कारण मी एका पक्षाच्या विचारधारेला मानून पुढे जाताना दुसऱ्या विचारधारेला मानणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी वाद होऊही शकतो, अधिक-उणा शब्द जाऊही शकतो. पण आता निवडणूक संपली आहे. कटुता आलीच असेल, तर ती दूर करायला हवी. त्या कटुतेचं वैरात रुपांतर होण्याची काहीच गरज नाही, अशी माझी प्रामुख्यानं भूमिका आहे. विरोधी पक्षातल्या कुणी बोलावलं, तर मी अगदी आनंदानं त्यांच्या घरी वा कार्यालयात पाहुणचार घ्यायला जाईन. विरोधी पक्षांतल्या कुणीही हक्कानं माझ्याकडे पाहुणचारासाठी यावं… माझं मन आणि दारही तुमच्यासाठी नेहमीच उघडं राहील.

आयुष्यात अनेकदा आपले अनेकांशी मतभेद होतातच… पण त्यांतून मनभेद होऊ नयेत, इतकंच.

‘राम’ या एकाच शब्दाचे किती तरी अर्थ आपल्या समृद्ध अशा मायमराठीत आहेत ना? म्हणजे बघा ना, राम म्हणजे तसं एक नाव आहे, पण आयुष्य जगण्याचा हा एक संस्कार आहे, एक तत्वज्ञान आहे. अयोध्येचा राजा राम या नावाचा प्रजापती असाही लौकिक आहे. खऱ्या अर्थाने लोकराज्य म्हणजेच रामराज्य होय. “राम” हा शब्द इंग्रजीत लिहिला, तर त्या RAM ला संगणकीय परिभाषेत आणखी एक वेगळा अर्थ आहेच. असा हा रामनामाचा महिमा… अर्थात ही रामकथा मी सांगतोय त्याचं कारण म्हणजे यंदाची रामनवमी आणि लोकसभेसाठी नुकतेच पार पडलेले मतदान. मी अयोध्येतील, राम मंदिराबाबत बोलतो, असंच तुम्हाला वाटेल. पण तसं अजिबातच नाहीये…

काय झालं, ते तुम्हाला सविस्तर सांगतोच. देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वाहणारे वारे आणि निवडणूक म्हटली प्रचार करण्यासाठी राजकीय नेत्यांनी मतदारसंघ पिंजून काढणंही आलंच. त्याला मीसुद्धा अपवाद नाही. मी भारतीय जनता पार्टीसाठी काम करतो, त्या पक्षाच्या प्रचारात मीसुद्धा सक्रीय सहभागी राहून बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार करत असताना रामनवमीच्या दिवशी मला एका नितांतसुंदर सोहळ्याचा साक्षीदार होता आलं. त्याचीच ही गोष्ट आहे…

आपला देश विविधतेतील एकात्मतेसाठी ओळखला जातो. कला, सण, उत्सव अशा समृद्ध ऐतिहासिक वारशाची देणगीच आपल्या देशाला लाभलेली आहे. आपला महाराष्ट्रही त्यात मागे नाही. विविध उत्सव, सण साजरा करणारा मराठी माणूस हा तसा उत्सवप्रियच. त्यातही प्रामुख्यानं ग्रामीण भागातल्या सण-उत्सवांची गोष्ट न्यारीच. शहरी भागात आज वेळेच्या अभावी सण साजरे करण्याच्या पद्धतीत आधुनिकतेचा साज चढला आहे. खेड्यात अजूनही सण, त्या निमित्तानं निघणाऱ्या यात्रा आणि भरणाऱ्या जत्रा, असं सगळं पारंपारिक पद्धतीत सुरू आहे. अध्यात्म, मनोरंजन, प्रबोधन असं सगळंच काही देणाऱ्या या जत्रा-यात्रा ग्रामीण भागाचं मुख्य आकर्षण असून त्यामागे अर्थकारणही आहे.

तर प्रचाराच्या रणधुमाळीचा एक फायदा असा झाला की, याच मोसमात निघणाऱ्या विविध यात्रा आणि जत्रांनाही हजेरी लावण्याची संधी मला मिळाली. लहानपणी वडीलधाऱ्यांचं बोट धरून ज्या यात्रा-जत्रांना गेलो होतो, त्याच्या आठवणीही या निमित्तानं ताज्या होत आहेत. यंदाच्या रामनवमीच्या दिवशी आम्ही गेलो होतो भोर या गावी. आता पुणे जिल्ह्यातलं हे गाव सुप्रसिद्ध आहेच. भोरच्या रामनवमी उत्सवाचा साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी मला लाभली.

भोर हे, तालुक्याचं ठिकाण आहे. भोर हे स्वतंत्र संस्थानही होतं. या संस्थानाचा कारभार शंकरजी नारायण यांच्याकडे छत्रपती राजाराम महाराज यांनी सन १६९७ मध्ये सोपवला होता. पंतसचिव या नात्यानं त्यांनी संस्थानाची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली होती. भोर हेच राज्याच्या राजधानीचंही ठिकाण होतं. साहजिकच भोरमध्ये राजवाडाही होता. होताच नव्हे, तर पुण्यापासून फक्त ५१ किलोमीटरवर असलेल्या भोरमध्ये तुम्हाला जुन्या वैभवाची आठवण देणारा राजवाडा आजही बघायला मिळू शकेल. प्राचीन भारतीय आणि युरोपियन बांधकाम शैलींवर या राजवाड्याचं बांधकाम आहे. राजवाड्यासमोर कारंजी आहेत आणि रामनवमीसारख्या उत्सवांच्या दिवशी मुख्य दरवाजासमोर झूल पांघरलेला हत्ती झुलायचा, अशा वैभवशाली आठवणी जुने-जाणते सांगतात.

या राजवाड्यातच रामाचं पुरातन मंदिर आहे. मूळ राजवाडा रामनवमीच्या उत्सवातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे शेजारीच हा नवा राजवाडा १८६९मध्ये बांधण्यात आला. तेव्हा यासाठी दोन लाख रुपये खर्च आल्याचं इतिहास सांगतो. रामनवमीच्या निमित्तानं या राजवाड्यात रामजन्माचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. भोर संस्थांनाचे मूळ पंतसचिव असलेल्या नारायण यांच्या वारसांकडेच आजही रामाला पाळण्यात घालण्याचा मान आहे. आज भोर सोडून बाहेर पडलेली, राज्य-देशाच्याही सीमा ओलांडून गेलेली ही मंडळी या सणाच्या निमित्तानं आवर्जून एकत्र येतात. इतकंच नव्हे, तर प्रामुख्यानं आपल्या पारंपरिक वेशभूषेत या सोहळ्यात सहभागी होत आपली संस्कृती आणि परंपरा पुढे नेत आहेत, हा एक अविस्मरणीय अनुभव होता. शिमगा-गणपतीला कोकणातला चाकरमानी नित्यनेमानं आपल्या गावी हजर असतो, त्याचीच मला या निमित्तानं आठवण झाली.

या राजवाड्याच्या मध्यवर्ती चौकात रामजन्माचा सोहळा होतो. पहिल्या मजल्याचे सज्जेही या वेळी गर्दीनं फुललेले होते. अनेक स्त्री पुरुष आपला पारंपारिक वेष परिधान करून आले होते. दुपारी ठीक बारा वाजता रामाला पाळण्यात घालण्यात आलं आणि ढोल-ताशाच्या गजरात, तुतारीच्या निनादात प्रभू श्रीरामजन्मोत्सव झाला. अत्यंत उत्साही आणि भक्तिभावानं भारलेलं हे वातावरण कसं होतं, सांगायचं तर अद्भुत… इतका एकच शब्द मला सुचतोय. बाकी, हा अनुभव तुम्ही याचि देहि याचि डोळा घेणंच उत्तम…!

रामनवमीच्याच दिवशी या गावात जानुबाई देवीची यात्राही असते. यात्रेनिमित्तानं जत्राही भरते आणि कुस्त्यांचा जंगी फडही असतोच. मग? आपल्या या सण-उत्सव, परंपरांची ओळख तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही करून देणार ना? पुढची रामनवमी भोरला, हे आत्ताच ठरवून टाका…

हा सोहळा संपल्यानंतर आम्ही याच तालुक्यातल्या बांडेवाडी गावच्या यात्रेला निघालो. आपल्या संस्कृतीत अनपेक्षितपणे जर कुणा परिचित व्यक्तीची भेट झाली तर रामराम म्हणून एकमेकांची विचारपूस करतात; इतकच नव्हे तर अपरिचित वाटसरू देखील एखाद्या गावकऱ्याशी संवाद साधताना ओघाने रामराम म्हणतो. बांडेवाडी गावच्या यात्रेमध्ये बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुप्रिया ताईंची झालेली भेट देखील या प्रथेला अपवाद नव्हती. थोडक्यात रामनामाच्या माळेत आपलं सर्वांचं जीवन गुंफले आहे.

रामराम !

पृथ्वी सूर्याला प्रदक्षिणा घालताना स्वतःभोवती प्रदक्षिणा घालते, हे विज्ञानाने आपल्याला सांगितलंच आहे. पण मानवी आयुष्याचं पण काहीसं तसंच आहे. आपणही आपल्याभोवती एक प्रदक्षिणा घालताना जणू जिथून सुरुवात केली होती, तिथेच परत येतो. यासंदर्भात प्रामुख्याने शेतीचंच उदाहरण घ्या ना… आपण पारंपरिक शेती करता करता आधुनिक शेती, संकरित बियाणं, अधिक उत्पन्न देणारी वाणं असं सगळं करता करता पुन्हा सेंद्रिय शेती किंवा आजच्या भाषेत ऑर्गनिक फार्मिंगकडे वळलोच ना… आधुनिक शेतीतील गोष्टी बऱ्या किंवा वाईट असं सांगण्या-ठरवण्याचा हा प्रयत्न नाही. पण आपण चक्राकार फिरून, प्रदक्षिणा घालून परत एकदा सुरुवात केली तिथेच परतलो आहोत, हेसुद्धा नाकारता येणार नाही…

म्हणूनच आजच्या युगात राहीबाई पोपेरेंसारखी महिला आणि त्यांचं कार्य या दोन्ही गोष्टी प्रामुख्याने महत्त्वाच्या ठरतात. पारंपरिक बियाणं जतन करण्याची त्यांची दूरदृष्टी आणि त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या दोन्ही गोष्टी अद्वितीयच म्हणाव्या लागतील. राहीबाई आहेत पोपेरेवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी. सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित जगातल्या निकषांनुसार त्या खरं तर अशिक्षितच. पण त्यांनी केलेलं काम हे डोंगराएवढं आहे. लौकिकार्थानं सुशिक्षित नसल्या, तरीही राहीबाईंचा एक विचार आणि तो आचरणात आणण्याची त्यांची तळमळ शिक्षित जगालाही मार्गदर्शक किंवा खरं तर पथदर्शकच ठरायला हवी.

अनेक पुरस्कारांनी गौरव झालेल्या राहीबाईंबद्दल नव्यानं सांगण्याची खरं तर काहीच गरज नाही. पण पारंपारिक बियाणांचं जतन करण्याची किंवा अशा बियाणांची बँक तयार करण्याची कल्पना त्यांच्या मनात कुठून आली असावी? आज हायब्रीड किंवा तत्सम बियाणांचे दुष्परिणाम जगासमोर येत आहेत. या बियाणांचा वापर करून प्रामुख्याने भले पीक जास्त येत असेल, आर्थिक फायदा होत असेलही… पण साकल्याने किंवा लाँग टर्म म्हणतो तसा विचार केला, तर त्याचे अनेक तोटेही आहेत. हे तोटे दृश्य स्वरुपात येण्यापूर्वीच राहीबाईंनी त्यांचे बियाणांच्या बँकेचं काम सुरू केलंही होतं. या गोष्टीबद्दल त्यांच्या दूरदृष्टीचं कौतुक करावं तितकं थोडंच नाही का? एक शेतकरी म्हणून कृषिक्षेत्र हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय आहेच. त्यामुळेच पारंपरिक बियाणांचा वापर करूनच शेती केली जावी, ही त्यांची धडपड वाखाणण्याजोगीच वाटते. पारंपरिक बियाणांचा वापर करून येणाऱ्या पिकातून पुढील लागवडीसाठी बियाणं उपलब्ध होतं, हे शेतकऱ्यांना माहिती नसण्याचं काहीच कारण नाही. हायब्रीड बियाणांतून ते शक्य होत नाही, हेसुद्धा त्यांना अनुभवातून समजलेलं असणारच. परंतु, हे समजण्यासाठी निश्चितच काही काळ लागलाच असेल. नेमक्या त्याच कालावधीत राहीबाईंचं हे पारंपरिक बियाण्यांचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम प्रामुख्यानं सुरू होतं. त्यामुळेच त्यांचं हे कार्य मोलाचंही ठरतं.

राहीबाईंना त्यांच्या या कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेतच, पण एक पुरस्कार त्यांना मीही प्रदान करू शकलो, ही बाब मलाही समाधान देणारी आहे. हा पुरस्कार देताना पारंपरिक बियाणांची ही बँक चालवताना काय अडचणी येतायत, याची कल्पना त्यांनी दिली होती. महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांची आणि त्यांची व्यथा एकसमान होती आणि आहे… घाम शिंपून पीक घेणाऱ्या अनेक बळीराजांच्या शिरावर पक्क्या घराचं छप्पर नाही… अस्वस्थ करणारी ही व्यथा दूर करण्यासाठी आमचं सरकार योग्य ती पावलं उचलतंय आणि यापुढेही उचलेल. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिजनमधून अनेक चांगले, सकारात्मक बदल घडले आहेत. कृषि क्षेत्रात मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना आणि एचव्हीडीएससारखी काही पावलं आम्ही उचलली आहेत. आणखीही उचलली जातील याची मला खात्री आहे आणि तशी ग्वाहीच मी या निमित्ताने देतो… पण ती चर्चा करण्याचा हा प्रपंच नव्हे.

तर, राहीबाईंना पुरस्कार दिला खरा. पण त्या सोहळ्यातच त्यांनी मांडलेल्या व्यथेमुळे मनात एक अस्वस्थता आली होती. काय करता येईल, याचा विचार सतत डोक्यात सुरू होता. अखेर मी एक निर्णय घेतला… राहीबाईंना हक्काचं घर मिळवून द्यायचंच…

कार्याची दखल घेत देश-विदेशांतून येणाऱ्यांची उठबस राहीबाईंना करता येईल आणि बियाणांचं जतन करण्यासाठी परिपूर्ण व्यवस्था असेल असं एक घर. प्रामुख्याने त्यांच्या गरजा पूर्ण होतील अशा प्रकारचीच या घराची रचना असावी, हा विचार सुनिश्चित करून मग त्यादिशेने प्रयत्न सुरू केले.

आज मला सांगायला आनंद होतो की, कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून राहीबाईंना पक्कं, त्यांच्या गरजा भागवणारं असं हक्काचं घर मिळालं आहे. त्यात कुठे तरी खारीचा वाटा का होईना उचलता आला, याचं मलाही निश्चितच समाधान आहे. आता राहीबाईंना त्यांचं काम अधिक जोमानं सुरू ठेवता येईल. त्यांच्या या कामाचा फायदा आज शेकडो-हजारोंना होत असेल, तर तो यापुढे लाखो-कोट्यवधींना व्हावा आणि हा माझा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशच सुजलाम-सुफलाम, आरोग्यपूर्ण व्हावा…

माझ्यासारख्या शेतकऱ्याचं आभाळातल्या बापाकडे यापेक्षा जास्त काय मागणं असू शकेल?