वाढदिवस-उपक्रम

सेवा संकल्प

“तन समर्पित, मन समर्पित, और यह जीवन समर्पित” यासारख्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी प्रेरित होऊन असंख्य संघ स्वयंसेवक राष्ट्र कार्य, समाजकार्याला वाहून घेतात. त्यातील काहीजण हे आज राजकीय क्षेत्रात पण कार्यरत आहेत. याच संस्कारांचा वसा घेतलेले चंद्रकांतदादा पाटील हे असे एक वेगळे व्यक्तिमत्व! ज्यांनी राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठीच केला आणि करत आहेत. आजच्या काळात एकीकडे वाढदिवस साजरा करण्याचे स्तोम माजत आहे तर दुसरीकडे प्रत्येक वाढदिवस कुठल्या न कुठल्या समाजपयोगी संकल्प सिद्धीचा उपक्रम ठरत आहे. मा.चंद्रकांतदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील प्रत्येक वाढदिवस हा वेगवेगळे सामाजिक संकल्प करून ते सिद्ध ही केले आहेत.

संकल्प-२०१६

कोल्हापूरमधील स्वयंसिद्धा ही महिला सबलीकरणाची अग्रगण्य संस्था. या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सामान्य महिला यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत. २०१६ मध्ये या संस्थेला महिला प्रशिक्षणासाठी एका प्रोजेक्टरची आणि तत्सम काही उपकरणांची आवश्यकता होती. संस्थेच्या सदस्यांनी चंद्रकांतदादांची भेट घेऊन ही गरज त्यांच्यापुढे मांडली होती. त्यानुसार दादांनी वाढदिवसाचे औचित्य साधून एका अनोख्या संकल्पाची घोषणा केली. दादांनी आपल्या वाढदिवसनिमित्त कार्यकर्त्यांना आवाहन केले की, पुष्पगुच्छ नको मला रद्दी द्या! दादांच्या या अनोख्या संकल्पाची सर्वत्र चर्चा झाली. अनेकांना हा प्रश्न पडला की, दादा या रद्दीचं करणार तरी काय? पण आपण काय करतोय, हे दूरदर्शी चंद्रकांतदादांना नेमके ठाऊक होते…. त्यांनी वाढदिवसानिमित्त कोल्हापूरातून गोळा केलेली रद्दी विकून मिळालेल्या रक्कमेत स्वत:ची भर टाकून प्रोजेक्टर घेण्याचे ठरवले होते. मात्र, रद्दी विकून उभी राहिलेली रक्कमच इतकी होती की, त्यातूनच प्रोजेक्टर आणि तत्सम उपकरणे खरेदी करून ही रक्कम शिल्लक राहिली.
आता, उर्वरित पैशांचे काय करायचे हा एक प्रश्नच होता. कारण लोकसहभागातूनच जमा झालेले हे पैसे होते. त्यामुळे दादांनी उर्वरित पैसेही त्याच उद्दात हेतूसाठी खर्च करण्याचा संकल्प केला. पश्चिम महाराष्ट्रात पावसाळ्यात महापूर किंवा दरड कोसळल्यासारख्या घटनांमध्ये अडकलेल्यांचे जीव वाचवण्याचे कार्य जीवनरक्षक श्री. दिनकर कांबळे अतिशय जोखीम पत्करून करत असत मात्र, त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्याने कोणत्याही प्रकारचे विमा सुरक्षा कवच घेतले नव्हते. दादांना ही बाब समजताच त्यांनी वाढदिवसानिमित्त उभ्या राहिलेल्या लोकसहभागातून दोन लाखाचा विमा उतरवून त्याचे आयुष्य सुरक्षित केले.

संकल्प-२०१७

शेतकरी सुखी तर सगळेच सुखी, अशी दादांची नेहमीच धारणा असते. त्यासाठी ते त्यांच्या परीने नेहमीच प्रयत्नशील असतात. पेरण्या सुरु झाल्या की शेतकऱ्यांना गरज असते ती बियाणांची आणि खतांची. त्यासाठी अल्प भूधारक शेतकऱ्यांना नेहमीच कुणापुढे तरी हात पसरावे लागतात. ही वस्तुस्थिती दादांना उत्तम ज्ञात होती. त्यामुळेच त्यांनी २०१७ च्या वाढदिवशी भेट वस्तू किंवा पुष्पगुच्छ नको मला खते किंवा बियाणे द्या. या त्यांच्या आवाहनाला समाजाने भरभरून साद दिली आणि ठिकठीकाणी अल्प भूधारक शेतकऱ्यांना खतांचे व बियाणांचे वाटप करण्यात आले. त्यात ८५०० गरजू शेतकऱ्यांना या संकल्पाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. पेरणीच्या हंगामात अचानक मिळालेल्या या मदतीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता.

संकल्प-२०१८

महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थती निर्माण झाली होती. संपूर्ण मराठवाडा, नगर, सोलापूर भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने दुष्काळाची दाहकता अधिक जाणवत होती.पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील महिला वणवण हिंडत होत्या. सरकारी यंत्रणा त्यांच्या त्यांच्या परीने पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत होती. या ग्रामीण भागात वस्त्या, वाड्या आणि खेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सरकारी यंत्रणेमार्फत येत असले तरी ते साठवण्यासाठी कुठलीही सोय उपलब्ध नव्हती. दादांनी ही निकड ओळखून पाणी साठवण्यासाठी पाच हजार लिटर क्षमतेच्या ३००० टाक्यांचे वितरण दुष्काळग्रस्त भागात लोकसहभागातून केले.

संकल्प-२०१९

२०१९ मध्ये ही पुन्हा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला. विशेष करून मराठवाड्यातील ग्रामीण भागात अनेक कुटुंबांचा आर्थिक डोलारा कोसळला होता. अशा दुष्काळी परिस्थितीत खर्च टाळण्यासाठी कुटुंबात मुलींच्या शिक्षणाला प्रथम बगल दिली जाते. मुलींना शिकून काय करायचे आहे? पुढे लग्न करून द्यायचे आहे; तो खर्च असतोच त्यामुळे आर्थिक संकटाच्या वेळी सर्व प्रथम कुऱ्हाड पडते ते मुलींच्या शिक्षणावरच. पैशाआभावी मुलींचे शिक्षण अर्धवट राहू नये ही दादांची आंतरिक भावना; या भावनेला वाट करून दिली ती या वर्षीच्या सेवा संकल्पाने.
दादांनी या वर्षी त्यांच्या वाढदिवसाला दुष्काळी भागातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी पंजाबी सलवार सूट आणि चप्पल बूट देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दादांच्या चाहत्यांकडून मिळाला. संकलित झालेल्या निधीतून आणि स्वनिधीतून दादांनी योजनाबद्धरित्या मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसेच सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण दुष्काळी भागातील महाविद्यालयांमध्ये अभाविप कार्यकर्त्यांच्या यंत्रणे मार्फत ३५ हजार गरजू विद्यार्थिनींना पंजाबी ड्रेस आणि चपला बुटांचे वितरण करवून घेतले. दादांचा वाढदिवस ते रक्षाबंधन या काळात ही विद्यार्थी भगिनींसाठी दादांनी दिलेली भेट अनोखी ठरली. या भेटीमुळे अनेक विद्यार्थी भगिनींच्या अनेक भावनिक प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.

संकल्प-२०२०

२०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठीच अतिशय भयावह ठरले. कोरोना महामारीमुळे संपूर्ण मानव जातच संकटात सापडली होती. यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक देश धडपडत होता. भारतातील पहिला रुग्ण पुण्यात सापडल्यामुळे पुणेकरही कमालीचे धास्तावले होते. या काळात कोरोनावर मात करण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणाही तोकडी पडत होती. कोरोनाच्या उद्रेकानंतर घराघरात असंख्य जण तापाने फणफणत होते. डिजिटल थर्मामीटर, मास्क आणि सॅनिटायझर यांची खरेदी अचानकच वाढली आणि त्यामुळे त्याचा तुटवडा सर्वत्र जाणवू लागला. सर्वसामान्यजण या अतिआवश्यक वस्तूंपासून वंचित राहू लागले म्हणून दादांनी वाढदिवसाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात निधी संकलित केला अन् आपल्या विद्यार्थी परिषदेच्या काळातील संपर्क वापरून पुणेकरांना मास्क, सॅनिटायझर, डिजिटल थर्मामिटर उपलब्ध करून दिले. अत्यंत कठीण परिस्थितीतही दादांनी सर्व कोविडच्या नियमांचे पालन करून एकही दिवस घरी न बसता अविश्रांत कार्यरत केले ज्यामुळे जनमानसाचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले.

संकल्प- २०२१

२०२१ मध्येही कोरोनाचे संक्रमण थांबले नव्हते, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेतही पुण्यात असंख्य रुग्ण बाधित झाले होते. हा काळ संपूर्ण मानव जातीची सत्वपरीक्षा पाहणारा होता. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी दादांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. सर्वप्रथम आपल्या आमदार निधीतून भरीव निधी शासनाला उपलब्ध करून देत बाणेरमध्ये ५०० बेडचे कोव्हिड सेंटर कार्यन्वित केले. या कोविड काळात कोविड रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती पण सर्वदूर ऑक्सिजन सिलेंडर चा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यामुळे ५००० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स विदेशातून पीएमओ आणि विदेश मंत्रालयाची विशेष परवानगी घेऊन ते तातडीने आयात करून गरजूंना उपलब्ध करून दिली.
कोविड परिस्थिती सुधारत असताना पुण्यात रिक्षा चालकांचे व्यवसाय ठप्प झाले होते, अनेक महिने बंद असलेला रिक्षा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी रिक्षा चालकांकडे पुरेसे भांडवल नव्हते. त्यांचे दैनंदिन जीवन जगणे ही कठीण झाले होते. कोथरूड मधील रिक्षा चालकांना मदतीचा हात म्हणून दादांनी यावर्षीच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने बीजभांडवल रक्कम रुपये १०००/- प्रत्येकी किमतीचे सीएनजी कुपन ५००० रिक्षा चालकांना देण्याचा संकल्प करून समाजाला आवाहन केले. त्यातून जमा झालेल्या निधी मध्ये स्वनिधीची भर टाकून ५००० रिक्षा चालकांना कोविडच्या संकट समयी व्यवसाय सुरु करून पूर्ववत होण्यासाठी प्रोत्साहन दिले.

संकल्प-२०२२

संकल्प-२०२३

कोरोनानंतर आपल्या आरोग्य यंत्रणेला ऊर्जित अवस्था आली असली; तरी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना उपचार घेताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती. खिशात पैसे नसल्याने अनेकांना उपचार आणि मोठ्या शस्त्रक्रिया करून घेणे अशक्य होत असे. त्यामुळे दादांनी २०२३ मधील आपला वाढदिवस आरोग्यसेवेसाठी समर्पित केला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना उपचारांसाठी मदत करण्याचे आवाहन केले. दादांच्या या संकल्पामुळे कोथरूडमधील असंख्य गरजू रुग्णांना अनेक खर्चिक उपचार मिळणे सहज शक्य झाले.

संकल्प-२०२४

वारेमाप वृक्षतोडीमुळे प्रदुषणाचा वाढता धोका, आणि प्रदुषणामुळे निसर्ग धोक्यात, हे अतिशय गंभीर समीकरण झालेले आहे. त्यामुळे ऋतूचक्र ही बदलत चालले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास वेळीच थांबवला नाही, तर आपल्याला सर्वनाश अटळ आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. 2024 चा आपला 65 वा वाढदिवस दादांनी याचसाठी समर्पित केला. त्यांनी महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि अमरावती आदी जिल्ह्यांमध्ये ६५ हजार औषधी आणि देशी झाडांची लागवड आणि संवर्धनाचा संकल्प केला. पहिल्या टप्प्यात कोथरुडमधील म्हातोबा, महात्मा आणि पाषाण टेकडी येथे दहा हजार पेक्षा जास्त औषधी आणि देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यासोबतच कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आणि महाराष्ट्रातील सर्व सार्वजानिक विद्यापीठांमध्ये वृक्ष रोपण करुन, हा संकल्प सिद्धीस नेला.